गंगापूर (प्रतिनिधी) पत्नीच्या तेराव्याच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर पतीने विरह अनावर झाल्याने प्राण सोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वांत घट्ट नाते मानले जाते. लग्नाची गाठ बांधतानाच ते एकमेकांसोबत जगण्याची आणि सुख दुःखात शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन घेतात. मात्र, मृत्यूनंतरही एकमेकांची साथ दिलेल्या पती-पत्नीच्या घटना तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील; पण अशी घटना गंगापूर तालुक्यातील जामगांवामध्ये घडली या घटनेत पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहाने पतीने तेराव्याच्या कार्यक्रमानंतर प्राण सोडले.
७० वर्षांच्या नर्मदाबाई त्रिंबकराव मंडलीक यांचे १० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हृदयविकाराने निधन झाले होते या घटनेमुळे त्यांचे ७५ वर्षांचे पती त्रिंबकराव मंडलीक यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळातील अनेक व्याधींना धैर्याने तोंड देणाऱ्या त्रिंबकराव मंडलीक यांचा धीर तुटला पत्नीचा तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे निघून जाताच २२ नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता त्रिंबकराव मंडलीक यांनी पत्नीच्या विरहात प्राण सोडले.
नर्मदा व त्रिंबकराव मंडलीक हे दोघे जामगांवातील रहिवाशी असून सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा, दोन मुली, सुन नातवंडे असा परिवार असुन ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभयंता बाबासाहेब मंडलीक यांचे वडील होत.अत्यंत गरीब परिस्थितीत दोघांनी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने ओढला. त्रिंबकराव मंडलीक यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता जामगांव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.