गौरी गणपती पाठोपाठ वरुण राजाच्या आगमनाने शेतपिकांना नवसंजीवनी मिळाली…
दमदार पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित !
तर गंगापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान व दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
गुरुवारी मोठ्या उत्साहात घरोघरी गौराई चे आगमन झाले त्या पाठोपाठ रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल दिड महिन्यानंतर झालेल्या या पावसाने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले. दरम्यान शेतातील पिके जगवण्यासाठी वरुणराजाकडे विनवणी करत गेले दोन महिने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरासरीच्या ३० टक्केही पाऊस झालेला नसल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. जुलै महिण्यात झालेल्या पावसाने दुबार पेरणी कशीबशी वाचलेली असताना पावसाने पुन्हा दिड महिना ओढ दिली. त्यामुळे उडीद, मुगाचे पीक जवळपास हातचे गेले. अन्य पिकांची आस या पावसावर होती या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्याने, गौरी गणपती पावल्या असल्याचा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस आडवा झाला. तर पावसाने कापसाचे पाते गळून गेल्याचे दिसून आले.
रात्री आठ नंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसास सुरुवात झाली चार ते पाच तास चाललेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाला चांगलाच आधार दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आता रब्बीची आशा ! चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता
जिल्ह्यात पेरणी ,कापूस लागवड नंतर जवळपास दोन महिने पाऊस नसल्याने पन्नास टक्के पिके वाया गेली शेतकरी बांधवाच्या हातातून खरीप हंगामाचे उत्पन्न निसटले आहे. सद्य स्थितीत गुरांना चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सह पशुपालक यांचे मात्र हाल होत आहेत.आज झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची आशा पल्लवित झाल्या असून असाच पाऊस होत राहिल्यास चाऱ्याची समस्या मिटेल असेही मत यावेळी शेतकरी बांधवानी व्यक्त केले.
गंगापूर शहरातील दुकानासह डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये शिरले पाणी
नगर पालिका नालेसफाई करत नसल्याने शहरातील अनेक दुकानात व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पाणी काढण्यासाठी नियोजन नसल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे रात्री आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत सलग झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे नालीसफाई नसल्यामुळे पाणी काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात शिरले यामुळे नगरपालिके विषयी रोष निर्माण करण्यात येत आहे