गंगापूर (प्रतिनिधी)गंगापुर शिवारातील कोल्हे व बागवान यांच्या गट नंबर २१९ मधील शेतातील जवळपास ११ एकरावरील उभा ऊस जळून खाक झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी.
शेतकरी मोठ्या कष्टानं आपल्या पिकांची काळजी घेत असतो. पोटच्या लेकरांप्रमाणे शेतातील पिकांना जपतो, त्यात ऊस या पिकाची काळजी घेताना पाणी देण्यासाठी त्याची होणारी तारांबळ सर्वांनाच माहिती आहे. ऊस हे पीक पाण्याशिवाय जगू शकत नाही.पण, ऊस हे पीक जगल्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींचा भार कमी होतो. मात्र, हाती आलेलं पीक अपघाताने गमावावं लागल्याची दुर्दैवी घटना गंगापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर गट नंबर २१९ मध्ये घडली आहे.
ही घटना २१ नोव्हेंबर मंगळवारी रोजी सकाळी १० वाजता घडली यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. गंगापुर येथील शेतकरी रामनाथ सर्जेराव कोल्हे, श्रीमती कोल्हे यांचा ७ एकर आणि वसीम बाबु बागवान यांचा ४ एकरावरील उभा उस जळाला आहे. या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या कुटुंबीयांवर मोठी निराशा पसरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वाऱ्यामुळे आग अधिकाधिक भडका घेत असल्याने या आगीत ऊस भस्मसात झाला.