गंगापूर (प्रतिनिधी) कोविड काळातील कार्यासाठी गंगापूरचे अतुल रासकर व रामचंद्र बिरुटे यांचा केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान
मुंबई येथे गुरुवारी (३० नोव्हेंबर) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘अप्रतिम मीडिया फाउंडेशन’तर्फे पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गंगापूर उपजिल्हा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर आणि कायगाव येथील रामचंद्र बिरुटे यांनी कोविड काळात केलेल्या सर्वोत्तम कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, ‘अप्रतिम मिडिया’चे संचालक डाॅ. अनिल फळे, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. मनोभावे केलेल्या जनसेवेत अधिक प्रगल्भता यावी यासाठी हा सन्मान करण्यात येत असल्याचे डाॅ. फळे यांनी सांगितले. कोविड काळात रामचंद्र बिरुटे आणि अतुल रासकर या दोघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिक आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे कार्य केल्याने या दोघांचा हा सन्मान होत असल्याचे परिषदेचे समन्वयक राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.
आम्हाला मिळालेला सन्मान गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर्स, कर्मचारी, रुग्ण कल्याण समितीतील सहकारी जेष्ठ पत्रकार विजय बनसोड, सुमित मुंदडा, प्रशांत मुळे या सर्वांचा असल्याचे अतुल रासकर यांनी सांगितले. यावेळी दत्ता जोशी, अमोल शिंदे यांची देखील उपस्थिती होती.