बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल

बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल.
परांड्यामध्ये गणपूर्तीअभावी निवड प्रक्रिया तहकूब करून २४ रोजी होणारी निवडणूक आता २६ मे रोजी घेण्यात येणार.

सोलापूर (प्रतिनिधी)- परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बुधवारी (२४ मे) होणाऱ्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीस उपस्थित राहता येऊ नये, म्हणून बाजार समितीच्या आठ नवनिर्वाचित सदस्य व त्यांच्या इतर चार साथीदारांना मारहाण करून फिल्मी स्टाईल अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विश्रामगृहात घडला. याबाबत सूर्यकांत ऊर्फ सुरेश कांबळे (रा. वरुड ता. भूम), गणेश जगदाळे (रा.खासगाव), प्रदीप पाडुळे (कवडगाव), प्रशांत शिंदे (रा. साकत), समाधान मिस्कीन (रा. डोणगाव), किरण ऊर्फ लादेन बरकडे याच्यासह ३० ते ३५ जणांवर टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा बाजार समितीची सभापती व उपसभापती यांची निवड बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार होती. महाविकास आघाडीचे बाजार समितीचे जयकुमार जैन, संजय पवार, रवींद्र जगताप, शंकर जाधव, सोमनाथ शिरसट, दादा घोगरे, हरी नवले, सुजित देवकते हे आठ संचालक व हरिश्चंद्र मिस्किन, सुदाम देशमुख, शरद झोंबाडे व किरण शिंदे हे त्यांचे चार साथीदार असे बाराजण उजनी धरणाच्या शासकीय विश्रामगृहातील तळमजल्यावरील दोन सुटमध्ये सोमवार (दि. २२) पासून मुक्कामास होते. बुधवारी सकाळी हे सर्वजण निवडणुकीसाठी परांडा येथे जाण्याच्या तयारीत होते. 

याचवेळी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सूर्यकांत ऊर्फ सुरेश कांबळे हा त्याच्या ४० ते ५० साथीदारांसह विश्रामगृहाच्या गेटवरून आत घुसले तेव्हा त्यांनी गेटवरच असलेल्या संजय पवार या संचालकास मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपींनी आपला मोर्चा विश्रामगृहाकडे वळवला. विश्रामगृहाचे सूट आतून बंद असल्याने आरोपींनी विश्रामगृहाच्या काचा फोडून नासधूस केली व विश्रामगृहात घुसून तलवार, कुकरी व पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण करत दहशत निर्माण करून सर्व संचालक व त्यांच्या साथीदारांना आहे त्या अवस्थेत उचलून आरोपींनी आणलेल्या गाडीत बसवून नेले. त्यानंतर एका व्हॅनिटरी व्हॅनमध्ये बसवून त्यांना मिरज सांगली, तासगाव या भागात दुपारी दोन वाजेपर्यंत फिरविले. तोपर्यंत निवडणुकीची वेळ संपून गेली होती. त्यानंतर या पळवून नेलेल्या सर्वांना मिरज भागातील कुमटे गावाजवळ सोडून देण्यात आले.

दरम्यान, मारामारीच्या घटनेनंतर माजी आमदार राहूल मोटे व ज्ञानेश्वर पाटील यांनी टेंभुर्णी पोलिस ठाणे गाठले होते. परांड्यामध्ये गणपूर्तीअभावी निवड प्रक्रिया तहकूब करून दि. २४ रोजी होणारी निवडणूक आता २६ मे रोजी घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!