गंगापूर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची नावे बनावट सह्या करून सामंजस्य करार नोंदणीकृत करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी प्रताप साळुंके याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह हर्सूल येथे करण्यात आली आहे.
याप्रकरणी दुय्यम निबंधक गंगापूर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी तीन नोव्हेंबर रोजी प्रताप साळूंके याचा शोध घेऊन अटक केली होती.यावेळी न्यायालयासमोर हजर केले असता प्रताप साळुंके यास तीन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते सोमवार दि.सहा नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालय समोर हजर केले असता तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी तपासात काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करायची असल्यामुळे दोन दिवसाच्या अवधी देण्याची विनंती केली होती यानंतर अंतरिम जामिनासाठी आठ नोव्हेंबर रोजी प्रकरण ठेवण्यात आले होते शासनाच्या वतीने सरकारी अभियोक्ता गोविंद कुलकर्णी,जावेद परकोटे तसेच तपास अधिकारी भागवत नागरगोजे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे व तपासातील महत्वपूर्ण कागदपत्रे याचा दाखला देत युक्तिवाद केला व आरोपीला जामीन देऊ नये अशी विनंती न्यायालयाला केली.तर आरोपीच्या वतीने ॲड.मंगेश जाधव तसेच ॲड. के.आर.कराळे यांनी काम पाहिले.न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तसेच सादर केलेले दस्तऐवज व पुरावे व सदर गुन्ह्यात कलम 467 भारतीय दंड विधान समाविष्ट करण्यात आल्याने तसेच आरोपीने याने मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान लाटल्याचे प्रथम दर्शनी विचारात घेऊन आरोपी प्रताप साळुंके याच्या वतीने दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.