हिंदू धर्म संस्कृती जगात महान,अखंड हिंदुस्थानाला टिकविण्यासाठी धर्म संस्कृती टिकवा -साध्वी दुर्गादीदी
नेवासा(प्रतिनिधी)आपली हिंदू धर्म संस्कृती जगात महान असून अखंड हिंदुस्थानाला टिकविण्यासाठी धर्म संस्कृती टिकवा,धर्म कार्य करणाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन हिंदू धर्म प्रचारक बिडकीन येथील साध्वी दुर्गादीदी यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये श्रावण मासाच्या निमित्ताने कीर्तनकार दीपालीताई पुणेकर यांच्या अधिपत्याखाली सूरु असलेल्या महिलांच्या पारायण सोहळयातील रात्री झालेल्या कीर्तन महोत्सवात साध्वी दुर्गा दीदी हया बोलत होत्या.यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी सोहळा संयोजक हभप दीपालीताई महाराज पुणेकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन साध्वी दुर्गा दीदी यांचे संतपूजन करण्यात आले.धर्म प्रचार प्रबोधन कार्याबद्दल भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर यांच्या हस्ते साध्वी दुर्गा दीदी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना साध्वी दुर्गा दीदी म्हणाल्या की आपण सर्व नेवासेकर भाग्यवान आहे, जेथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान विष्णूच्या अवतारात प्रगट होऊन भागवत गीतेचे निरुपण ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण करून केले. म्हणूनच ग्रंथराज ज्ञानेश्वरी याच भूमीत जन्माला आली.येथील पैस खांबाला माऊलींचा स्पर्श झाला
तोच पैस खांब भाविकांचे श्रध्दास्थान बनला आहे.
आपल्या देशाची माती चंदन प्रमाणे असून प्रत्येक गाव हे तपोभूमी प्रमाणे आहे,ग्राम,देशातील बालिका देवीच्याच प्रतिमा असून प्रत्येक बालक हे प्रभू रामचंद्र भगवंतांचे रूप असल्याचे त्यांनी कीर्तनातून उदाहरणे देत सांगितले,चंद्र यानाचे नेतृत्व देखील एक महिला करत असून आता महिलांनी स्वतःच रक्षण स्वतःच करण्याची वेळ आली असल्याने यासाठी महिलांनी पुढे यावे,अध्यात्म सारखे कार्य त्यांनी घ्यावे असे सांगत महिलांसाठी कीर्तन महोत्सव सुरू करणाऱ्या हभप दीपालीताई महाराज पुणेकर यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले
संतांच्या संगतीत व बरोबर रहाणारी माणसे जीवनात धन्य होतात,प्रत्येकाने आपल्या धर्माचा,त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्याचा अभिमान बाळगावा, कपाळी असलेल्या टिळयाचा व गळ्यात घातलेल्या माळेचा आदर करा,जीवन जगत असताना धर्म संस्कृतीचा आदर करा,अखंड हिंदुस्थान टिकविण्यासाठी धर्म संस्कृती टिकवा,व्यर्थ बडबड बाजूला सारून आताच्या माऊलींनी स्त्री शक्तीने भगवत गीता व संत चरित्राचे, रामायण महाभारत धडे आपल्या मुली मुलांना द्या त्यासाठी पुढे या असे आवाहन केले.
आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या,राजमाता जिजाऊ,झाशीची राणी यांच्या कार्याचा दिव्य संदेश आजच्या मुलींना द्या त्यामुळे ती लव्ह जिहाद ची शिकार बनणार नाही व बनू देणार नाही,मुलींच्या हातात पाश्चिमात्य संस्कृती देण्यापेक्षा राणी पद्मिनी चे चरित्र वाचायला द्या,समाजात देशभक्तीच्या भावनेने चांगली माणसे काम करत आहे अशा चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करा अशी माणसे मोठी करायला शिका,त्यांना पुढे चालण्यासाठी साथ द्या,खेकडे वृत्ती सोडून द्या असा संदेश ही साध्वी दुर्गा दीदी यांनी कीर्तनातून देऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
श्री गुरूंच्या अनुग्रह शिवाय मनुष्य जीवन धन्य होत नाही,काही लोक निंदा सोडू शकत नाही तर आम्ही भगवंतांचे भजन का सोडावे,जगाच्या पाठीवर सर्व श्रेष्ठ असलेला आपला हिंदू धर्म व संस्कृती आहे तिला जपा,धर्म कार्य करणाऱ्याला विरोध करु नका,नारी शक्ती मोठी आहे,राष्ट्र पुरुषांना जन्म देणारी ही देखील स्त्रीच आहे याची जान समाजाने ठेवावी, स्त्री ने देखील अंग भरून कपडे घालावे डोक्यावर पदर घ्यावा व आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यावेळी महिलांसह पुरुष भाविक युवक युवती बालके मोठ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित होती.भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी धर्मरक्षक अण्णाभाऊ लष्करे मित्र मंडळ,हिंदूराजे मित्र मंडळ,मित्र परिवार मित्र मंडळातील सदस्यांनी सोहळयासाठी महाप्रसाद वाटपासाठी मोठे योगदान दिले.