गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर-खुलताबाद मतदार संघात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे आमदार प्रशांत बंब यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की जिल्ह्यासह गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील खरीपातील तुर, कापुस यासह रब्बी हंगातील गहू, ज्वारी, मका, हरभरा, कांदा, तसेच फळपिके मोसंबी, डाळिंब इत्यादी व भाजीपाला अशा सर्वच पिकांचे २६ नोव्हेंबर रोजीच्या रात्री अवकाळी वाऱ्यासह पाऊस, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही पिके वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पुर्णत: नष्ट झालेली आहेत. तथापि, खरीप हंगामध्ये गंगापूर तालुक्यातील १२ पैकी ८ मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे, परंतू उर्वरीत डोणगांव, गाजगाव, आसेगांव, जामगांव, या चार महसूल मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधितांना निर्देशीत करुन झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल, या दृष्टीकोनातून आपल्या स्तरावरुन कार्यवाही करावी असे आमदार प्रशांत बंब यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.