चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून, वाळुज परिसरात खळबळ


गंगापूर (प्रतिनिधी) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला आणि घराला कडी लावून फरार झाला. बुधवारी रात्री नऊ वाजे नंतर घडलेली ही अत्यंत खळबळ जनक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी २३ मे रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,रांजणगाव (शेणपुंजी) च्या एकतानगर येथील कृष्णानगर येथे गुरुवारी २३ मे रोजी सकाळी ७ वाजता ज्योती सुभाष राऊत २९ ही विवाहित महिला बेशुद्ध अवस्थेत घरात पडलेली आढळून आली. ही माहिती नागरिकांकडून रूम मालक नसिर शेख यांना तसेच पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान हरिदास उत्तम उबाळे व घर मालक नसिर शिकंदर शेख यांनी तिला उपचारार्थ घाटी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते .

हरीदास उत्तमराव उबाळे वय ३० वर्ष, रा-मासनपुर ता.भोकरदन जि.जालना याची भाची ज्योती संतोष मोरे हिचे लग्न सुमारे 10 वर्षापुर्वी सुभाष गणेश राउत रा. क्षिरसागर ता.भोकरदन याच्याशी झाला आहे. त्यांना सात वर्षाची मुलगी साक्षी व पाच वर्षाचा मुलगा पवन असे मुले आहेत. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सुभाष राउत हा ज्योती हिस चारित्रयाचे संशयावरुन वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. ती माहेरी आई-वडीलाकडे व मामाच्या गावी भेटायला आल्यानंतर पतीचे त्रास बाबत त्यांना सांगत होती. परंतु ते तिला समजावुन सांगत नांदवयास पाठवत होते. तसेच सुभाष याला गावी बोलावुन गणराज सांडू गावंडे, कडूबा किसन कोलते व ज्योतीचे आईवडील यांनी समजावुन सांगीतले होते. त्यानंतर ज्योती, व त्यांचे दोन्ही मुले ज्योतीच्या आई वडीलाकडे राहत होते. तेथेही सुभाष हा दारु पिवून ज्योतीला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्यामुळे ज्योती, तीचे आई वडील त्यास खुप त्रासले होते. ज्योतीने दोन्ही मुलांना शिक्षणसाठी ज्योतीच्या आई वडीलांडेच ठेवून ज्योती व सुभाष असे सुमारे एक महिन्यापुर्वी एकतानगर, रांजणगाव येथे किरायाच्या घरात रहावयास आले होते. परंतु सुभाष हा दारु पिवून वेळोवेळी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिस मारहाण करून शारीरीक व मानसिक त्रास देत होता. बुधवारी (ता.22) रोजी रात्री 9 ते गुरुवारी (ता.23) रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान गळा दाबुन ज्योतीस जिवे ठार मारले व बाहेरुन दरवाजास कडी लावली. आणि निघून गेला. या प्रकरणी हरिदास उबाळे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सुभाष राऊत याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!