![](http://janakrosh.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230710-WA0027-1024x770.jpg)
आमदार प्रशांत बंब यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; नागरिकांनी मांडले गा-हाणे, अनेक तक्रारी प्राप्त
तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आमदार बंब यांचे प्रशासनाला आदेश
गंगापूर (प्रतिनिधी) भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बांधकाम परवानगी,पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, रस्ता, अनधिकृत बांधकामे, महावितरणचे धोकादायक पोल अशा विविध विभागाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागांनी जनतेच्या तक्रारीचा तातडीने निपटारा करावा. सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देऊ नका, त्यांना आपल्या कार्यालयात खेट्या मारायला लावू नका, अशा सूचना आमदार बंब यांनी अधिका-यांना दिल्या.
गंगापूर शहरातील नागरिकांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने शिवकृपा मंगल कार्यालयात रवीवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान हा जनता दरबार घेतला यावेळी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड नगरपालिकेच्या मुख्याधीकारी पल्लवी अंभोरे, तहसीलदार सतीश सोनी, आदींसह कर्मचारी उपस्थित होते
शहरातील नागरिकांची जनता दरबारात उपस्थित होते. नागरिकांनी आपली गा-हाणी, समस्या, प्रशासनाकडून कामे करताना होत असलेला विलंब सांगितला. आपली कैफियत मांडली.बांधकाम परवानगी जाणुन बुजुन देत नाही, पाणीपुरवठा सुरळीत चालू करा, संथ गतीने सुरु असलेली कामे, ड्रेनेची समस्या, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, अशा विविध विभागाशी संबंधित तक्रारी नागरिकांनी दरबारात मांडल्या. आमदार बंब यांनी सर्व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. नागरिकाने समस्या सांगताच तत्काळ संबंधित विभागाच्या अधिका-याला आमदार बंब यांच्याकडून तक्रार मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. तक्रार सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने आणि ती मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी आमदार प्रशांत बंब यांचे आभार मानले.
आमदार बंब म्हणाले, ”लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावणे माझे काम आहे. नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित तक्रारी एकाच छताखाली निकाली निघाव्यात यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या माध्यमातून जनतेच्या काय समस्या आहेत, हे अधिका-यांना कळले. जनता दरबारात नागरिकांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागाला पाठविण्यात येतील. ज्या तक्रारी तत्काळ निकाली निघतील. त्याचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे. ज्या तक्रारी मार्गी लागू शकत नाहीत. अडचणीच्या आहेत. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. किती तक्रारी निकाली निघाल्या. याचा मी स्वत:२२जुलै रोजी दुपारी चार वाजता जनता दरबारात आढावा घेणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा वंदना पाटील माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, भाग्येश गंगवाल,रामेश्वर मुंदडा,कृऊबा सभापती भाऊसाहेब पदार, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवाहारे, अतुल रासकर, प्रशांत मुळे, आशिर्वाद रोडगे, आदींसह नागरिक उपस्थित होते